मुंबई – साध्वी प्रज्ञासिंह यांना भोपाळ मधून लोकसभा निवडणूक लढवण्यास मनाई करावी आणि त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करावा अशी मागणी करणारा एक अर्ज मालेगाव बॉम्बस्फोटात मरण पावलेल्या एका व्यक्तीच्या पित्याने एनआयए कोर्टात केला आहे. तो अर्जच खोडसाळ असून राजकीय हेतूने तो करण्यात आला आहे त्यामुळे त्याचा विचार करू नये असे उत्तर साध्वींच्यावतीेने एनआयए कोर्टात आज सादर करण्यात आले.
आपल्या वकिलांमार्फत त्यांनी एनआयए कोर्टाचे न्यायाधिश व्ही. एस पडळकर यांच्याकडे हा खुलासा सादर केला. केवळ सवंग प्रसिद्धीसाठी हा अर्ज करण्यात आला असून त्यात राजकीय हेतुही स्पष्ट दिसतो आहे असे त्यांनी यात म्हटले आहे. हा केवळ कोर्टाचा वेळ घेण्याचाच प्रकार नसून न्यायालयाचाही अवमान करण्याचा त्यात हेतू आहे असेही त्यांचे म्हणणे आहे. दुष्ट हेतूने आपल्या विरोधात हा अर्ज करणाऱ्यावर कठोरकारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.