नागपूर – राज्यात आपले सरकार असते तर अनेक प्रकल्पांना लगेच परवानगी मिळाली असती. मात्र हे सरकार म्हणजे म्हाताऱ्या बैलासारखं आहे. टोचणी दिल्याशिवाय चालतच नाही, असा टोमणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ठाकरे सरकारला लगाविला आहे.
सध्या पदविधर मतदारसंघासाठी निवडणुकांचा प्रचार सुरू आहे. यासाठीच्या प्रचारसभेत बोलताना नितीन गडकरी यांनी राज्य सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. गडकरी म्हणाले, नागपूरमधल्या ब्राडगेज मेट्रोसाठी राज्य सरकारची परवानगी मिळायला 1 वर्ष लागले.
एका वर्षानंतर मंजुरी देण्यात मिळाली. त्यासाठी सरकारचे धन्यवाद. अशा प्रसंगी कळतं की आपलं सरकार असतं तर एक महिन्यात ब्राडगेज मेट्रोला मंजुरी मिळाली असती. त्यासाठी मी अजित पवार, एकनाथ शिंदे यांना फोन करून फॉलोअप घेतला.
गडकरी म्हणाले, आता ट्रॅक्टरही सीएनजीवर चालविण्याचा सरकार विचार करत आहे. असे झाले तर शेतकऱ्यांचे लाखो रुपये वाचतील. विदर्भात शेतकऱ्यांकडे किमान 1 लाख ट्रॅक्टर असतील. यामुळे खूप फायदा होणार आहे.
तसेच नागपूरला आंतरराष्ट्रीय विमानतळ मंजूर करण्यात आले होते. त्यासाठी कंत्राटही काढण्यात आले. मात्र सरकार बदलले आणि तो प्रकल्प रखडला. असे अनेक प्रकल्प राज्यात रखडले आहेत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.