बदलत्या वातावरणामुळे ऋतूचक्र बदलतेय; अवेळी आलेले आंबे खातायत भाव
पिंपरी – साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर आंब्याची पुजा करण्याची प्रथा असून या दिवसापासूनच आंबे खाण्याला सुरुवात होते. मात्र, गेल्या काही वर्षांत बदलत्या वातावरणामुळे आंब्याची आवक लवकरच सुरु होत असल्याने आंबा खाण्याचा मुहूर्त अक्षयतृतीयेऐवजी आता गुडीपाढवा ठरू लागला आहे.
आंब्याचे दिवस म्हटले की सर्वांना अक्षय तृतीयाचे मुहूर्त आठवते. मात्र, गेल्या काही वर्षापासून आंब्याची आवक आधीच सुरू होत असून मराठी नववर्षापासून म्हणजे गुढीपाडव्यापासूनच बाजारात आंबा उपलब्ध होत आहे. त्यामुळे एक महिना आधीच आंबा शौकीनांना आंब्याचा आस्वाद घ्यायला मिळत आहे. पिंपरी-चिंचवड येथील मोशीच्या बाजारपेठेत आंब्याची आवक वाढत असून आंबे खवय्यांना त्यासाठी आगाऊ पैसे मोजावे लागत आहेत.
बाजारात येत असलेला आंबा हा कोकणातला नसून कर्नाटक व अन्य परराज्यातून येत असल्याचे मोशी येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी सांगीतले आहे. परराज्यातून येणारा आंबा पहिल्यांदा पुण्यातील मार्केट यार्डात येतो त्यानंतर थेट मोशी येथील मार्केट कमिटीमध्ये दाखल होत आहे. तेथून गरजेप्रमाणे व्यापारी आंबा खरेदी करुन पिंपरी-चिंचवड शहरात विक्रीसाठी घेवून येत आहेत. सध्या बाजारात आलेल्या आंब्याच्या जातीमध्ये हापूस, रत्नागीरी, देवगढ, लालबाग यांचा समावेश आहे. यासाठी नागरिकांना मोठी रक्कम मोजावी लागत असून 2 डझन आंब्यासाठी सुमारे दिड हजार रुपये मोजावे लागत आहेत.
अक्षय तृतीयेनंतर खऱ्या अर्थाने आंब्याच सिझन सुरू होतो आणि किंमतीतही घट होते. मात्र, अवेळी आलेल्या अंब्यांची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने दरही मिळत असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत असल्याचे चित्र आहे. उन्हाळा सुरु झाल्याने शहरात जागो-जागी रसवंती सुरू झाल्या आहेत. त्याच बरोबर आंब्याच्या रसाला सुध्दा तितकाच प्रतिसाद मिळत असल्याने आंच्याच्या किमती आधिकच भाव खात आहेत.