कोलकाता – राज्य सरकारची अनुमती न घेता राज्यातील आयपीएस पोलिस अधिकाऱ्यांच्या परस्पर बदल्यांचा जो आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिला आहे त्यावर ममतांनी आक्रमक भूमिका घेत केंद्राच्या आदेशांना केराची टोपली दाखवली आहे.
त्या संघर्षात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, पंजाबचे मुख्यमंत्री कॅ अमरिंदरसिंग, द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन या नेत्यांनी ममतांची पाठराखण केली आहे. त्याबद्दल ममतांनी त्यां नेत्यांचे आभार मानले आहेत.
त्यांनी म्हटले आहे की केंद्र सरकारने राज्यांच्या कारभारात हस्तक्षेप चालवला असून ही बाब कोऑपेटिव्ह फेडरलीझमच्या विरोधात आहे. या प्रकरणात ज्या नेत्यांनी आपल्याला पाठिंबा दिला आहे त्यांचे आपण आभारी आहोत असे ममतांनी म्हटले आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने पश्चिम बंगाल मधील कायदा आणि सुव्यवस्था स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी आज पुन्हा बंगालचे मुख्य सचिव अलपन बंडोपाध्याय आणि पोलिस महासंचालक विरेंद्र यांना दिल्लीला बोलावले आहे. पण या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे आपण उपस्थित राहु शकतो असे केंद्राला कळवले आहे.