साउदॅम्पटन – आमच्या संघातील पहिली फळीच एवढी मजबूत आहे की, माझा क्रमांक येईपर्यंत षटके संपून जातात ही खंत व्यक्त केली आहे भारताचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव याने. त्याने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक करीत संघाच्या विजयास हातभार लावला होता.
जाधव याची ही पहिलीच विश्वचषक स्पर्धा आहे. त्याला या स्पर्धेतील दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्धच्या लढतीत फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. पाकिस्तानविरुद्ध त्याला जेमतेम आठ चेंडू खेळावयास मिळाले होते. अफगाणिस्तानविरुद्ध तो 88 मिनिटे खेळपट्टीवर होता. त्यामध्ये त्याने 68 चेडूंमध्ये 52 धावा केल्या होत्या.
जाधव याने सांगितले की, खेळपट्टी फटकेबाजी करण्यासाठी पोषक नव्हती. फिरकी गोलंदाजीस ही खेळपट्टी थोडी साथ देत होती. महेंद्रसिंग धोनी याच्या साथीत खेळत असताना 250 ते 260 धावांचा पल्ला गाठण्याचे आमचे घ्येय होते.
महेंद्रसिंग धोनी लवकर बाद झाल्यामुळे आम्ही अपेक्षेइतके लक्ष्य ठेवू शकलो नाही. आम्हाला 15 ते 20 धावा कमी पडल्या आहेत हे लक्षात घेऊनच आम्ही क्षेत्ररक्षण करताना या धावा कशा वाचवता येतील यावर भर दिला.