मुंबई – करोनाचा धोका असताना प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालुन नागरिकांसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या पोलिसांना भारताचा अष्टपैलु क्रिकेटपटू हार्दिक पंड्या याने सलाम केला आहे. तसेच जगभरात आपल्या कार्याने कौतुकास पात्र ठरलेल्या पोलिसांचे त्याने अभिनंदनही केले आहे.
करोनाचा प्रभाव वाढत आहे, त्यामुळे सर्व जगातील क्रिकेटसह सर्व क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. तसेच ऑलिम्पिकसह अनेक स्पर्धा लांबणीवर पडल्या आहेत. क्रिकेटचे सामने, सराव सर्वकाही स्थगित झाल्याने एक खेळाडू म्हणुन मलाही निराशा येते. पण असा नकारात्मक विचार करणे योग्य नाही. आपण जर पूर्ण सकारात्मक राहिलो तर परिस्थितीशी सामना करणे सोपे ठरते, असेही पंड्याने सांगितले.
देशात लॉकडाऊन असल्याने नागिकांना बाहेर पडता येत नाही. मलाही गेले अनेक दिवस घरातच व्यायाम करावा लागत आहे. एकीकडे या सगळ्यामुळे खूप त्रास होतो. पण या संकटावर मात करण्यासाठी सगळ्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. खेळ काय पुन्हा सुरु होईल पण सरकार, यंत्रणा तसेच विविध आवाहने यांचे तंतोतंत पालन करुन इतरांचीही जागृती करण्याची त्यांची मदत करण्याची हीच योग्य वेळ आहे, असेही पंड्याने व्यक्त केले. पंड्यामूळचा बडोद्याचा आहे मात्र, आता तो मुंबईकरच झाला आहे.