चंदिगड -पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून जीएसटी कायद्यात बऱ्याच दुरुस्त्या करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे.
हा कायदा लागू केल्यापासून कायद्यातील गुंतागुंतीमुळे राज्य सरकार आणि उद्योजक हैराण आहेत. ते म्हणाले की मी, पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात 101 सूचना केलेल्या आहेत. या सर्व सूचनांच्या आधारावर काही दुरुस्त्या शक्य आहेत. मुळात राज्यासाठींचा जीएसटी हा केंद्र केंद्रासाठीच्या जीएसटीपेक्षा जास्त असला पाहिजे. त्यामुळे राज्याच्या महसुलात घट होणार नाही. त्याचबरोबर सुरुवातीच्या काळात उद्योजकांकडून चुका झालेल्या आहेत. मात्र त्या चुकांसाठी त्यांना माफ करण्याची गरज आहे.
त्याचबरोबर जगभरातील जीएसटीचा विचार केला असता भारतातील जीएसटीच्या टप्प्यांची संख्या चारपेक्षा जास्त आहे. ती शक्य तितकी कमी करण्याची गरज आहे. त्यामुळे गुंतागुंत कमी होईल आणि करचुकवेगिरी कमी होईल असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर जीएसटीचा विस्तार करण्यासाठी यामध्ये वीज, रिअल इस्टेट आणि पेट्रोलियम पदार्थांचा समावेश करण्याची गरज आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारचा फायदा होईल. जीएसटी अंमलात आल्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नात दीड टक्के वाढ होईल असे बोलले जात होते. मात्र ते स्वप्नच राहिले आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण केलेल्या सूचनांवर विचार करावा, असे त्यांनी म्हटले आहे.