नवी दिल्ली – नेतृत्वाचा प्रलंबित मुद्दा, बंडखोरी, नाराजी, सत्तापटलावरील पीछेहाट आदी बाबींमुळे सरलेले वर्ष कॉंग्रेससाठी नकारात्मक ठरले. त्यामुळे नववर्षात तरी अस्वस्थता कॉंग्रेसची पाठ सोडणार का, याबाबत उत्सुकता राहणार आहे.
मागील वर्षी फेब्रुवारीत दिल्ली विधानसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीत कॉंग्रेसला खातेही उघडता आले नाही. त्यानंतर प्रभावी नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी केलेल्या बंडखोरीमुळे कॉंग्रेसला मध्यप्रदेशची सत्ता गमवावी लागली.
मागील वर्ष सरताना बिहारमध्ये विधानसभा निवडणूक झाली. त्यामध्येही कॉंग्रेसची कामगिरी सुमार ठरली. राजस्थानमध्ये तरूण नेते सचिन पायलट यांच्या बंडामुळे कॉंग्रेस सरकार अडचणीत आले होते. मात्र, ते बंड शमल्याने तेथील सरकारचा धोका टळला.
गतवर्षात नेतृत्वाच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसमध्ये अस्वस्थता असल्याचे समोर आले. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठवून संघटनात्मक पातळीवर व्यापक फेरबदलांची मागणी केली. तेव्हापासून कॉंग्रेसला नवा अध्यक्ष मिळण्याच्या चर्चा सुरू आहेत.
आता नव्या अध्यक्षांबाबत नववर्षात कॉंग्रेसजनांची अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता आहे. पुढील काही महिन्यांत तामीळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकांनी मागील अपयश पुसून टाकण्याची संधी कॉंग्रेसला दिली आहे.