नवी दिल्ली – जोपर्यंत मोदी पंतप्रधान आहेत तो पर्यंत या देशातील शेतकऱ्यांची जमीन कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही, असे गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.
दिल्लीजवळील किशनगड येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात बोलताना ते म्हणाले की, केंद्र सरकारने केलेले कायदे हे कृषी विरोधी आहेत अशी जर शेतकऱ्यांची धारणा असेल तर मोदी सरकार त्याविषयी त्यांच्याशी चर्चा करण्यास आणि त्या सूचनांचा विचार करण्यास तयार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
कृषी कायद्यातील एमएसपी आणि अन्य मुद्द्यांच्या अनुषंगाने शेतकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचे काम कॉंग्रेस पक्ष व अन्य विरोधक करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट एमएसपी मिळाली पाहिजे ही शेतकऱ्यांची वर्षानुवर्षांची मागणी असायची मोदी सरकारने ती पूर्ण केली असल्याचा दावाही त्यांनी केला.
किशनगड येथे आयोजित मेळाव्यात पंतप्रधानांचा शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचाही उपक्रम करण्यात आला आणि शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी देण्याचेही वितरण सुरू करण्यात आले. या कार्यक्रमाला अमित शहा उपस्थित होते.