ट्युनब्रिज बेल्स – इंग्लंडमधील ओव्हल किंवा लॉर्डस मैदानांसारखा वारसा नेव्हेल्ली मैदानास लाभला नसला तरीही भारतीय क्रिकेटसाठी हे मैदान म्हणजे चेहरामोहरा बदलणारे मैदान आहे. आजही अनेक भारतीय क्रिकेट चाहते या मैदानास भेट देत त्याची छबी आपल्या कॅमेरात टिपण्याचा प्रयत्न करतात.
भारताने 1983 मध्ये पहिल्यांदा विश्वचषकावर कोरले आणि इतिहास घडविला. या स्पर्धेतील झिम्बाब्वेविरूध्द भारताचा सामना येथे झाला होता. या सामन्यात कर्णधार कपील देवकडून झालेली नाबाद 175 धावांची खेळी कलाटणी देणारी ठरली. एकवेळ भारताची 4 बाद् 9 अशी स्थिती होती. त्यावेळी चार हजार प्रेक्षकांच्या साक्षीने त्याने सोळा चौकार व सहा षटकार ठोकत मैदान दणाणून सोडले. या खेळीमुळेच भारताचे आव्हान टिकले गेले. त्यानंतर भारताने मागे पाहिलेच नाही. ही स्पर्धा भारताने जिंकली आणि तेथूनच खऱ्या अर्थाने भारतीय क्रिकेटला संजीवनी मिळाली.
इंग्लंडमधील अन्य नामवंत स्टेडियमसारखे वलय या मैदानास लाभलेले नाही. तरीही भारतीय क्रिकेट् चाहते केंटमध्ये आले आणि या मैदानास भेट् दिली नाही असे सहसा घडत नाही. केंट कौंटी रेल्वे स्थानकापासोन केवळ पंधरा मिनिटांच्या हे मैदान असल्यामुळे या मैदानास भेट देणाऱ्यांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे. अर्थात त्यामध्ये भारतीय पर्यटकांचा अधिकाधिक समावेश असतो. मैदानावर कायमच हिरवळ असते आणि मैदानाच्या सभोवतालीही भरपूर झाडी असल्यामुळे हा परिसरही निसर्गरम्य आहे.
कपील देवच्या या शतकाचे साक्षीदार असलेले जेफ्री रिचर्डस यांनी या मैदानाच्या समोरील घर विकत घेतले आहे. त्यांनी सांगितले की, या सामन्यास मी उपस्थित होतो. मी कपीलच्या खेळामुळे इतका प्रभावित झालो की जेव्हा मूळ मालकाने हे घर विकायची जाहिरात दिली, तेव्हा मी त्वरीत त्याला गाठले आणि खरेदी केले. मी आता वयस्कर असल्यामुळे या मैदानावरच माझे अधिकधिक वास्तव्य असते. जेव्हा जेव्हा येथे भारतीय पर्यटक येतात तेव्हा तेव्हा त्यांना मी सविस्तर माहिती देतो. माझाही वेळ जातो आणि माझ्या डोळ्यासमोर तो सामना उभा राहतो. अनेक पर्यटक येथील माती किंवा गवत छोट्याशा डबीत नेण्यास विसरत नाहीत.