नेवासे: मुळा धरणाच्या पाण्यातून 80 टक्के पाणी नेवासा तालुका वापरतो. उर्वरित 20 टक्के पाणी शेवगाव, पाथर्डी, राहुरी व नगर तालुके वापरतात. तेथे पाण्याचे नियोजन होत असल्याने शेतकऱ्यांना फायदा होतो. मात्र नेवाशात 80 टक्के पाणी वापरूनही अधिकारी व लोकप्रतिनिधीच्या नियोजनअभावी तालुका भकास झाला असून चार महिन्यात एकही रोटेशन का नाही? असा आरोप माजी सभापती सुनिता गडाख यांनी केला.
तेलकुडगाव येथील ग्रामपंचायत अंर्तगत नवनाथ घोडेचोर यांच्या जनावरांच्या गाय गोठ्याचे उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पंचायत समिती सभापती कल्पना पंडित, उपसभापती राजनंदिनी मंडलिक, घोडेगावचे माजी सरपंच बाळासाहेब सोनवणे, साहयक गटविकास अधिकारी नवनाथ पाखरे, विस्तार अधिकारी कदम, कक्ष अधिकारी संभाजी भदगले आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गडाख म्हणाल्या, मुळा धरणाच्या पाट पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी सक्षम लोकप्रतिनिधी पाहिजे. मागील पंचवार्षिकमध्ये योग्य नियोजन झाल्याने शेतकऱ्यांना उन्हाळ्यात 2-2 रोटेशन मिळत होते. निळवंडे धरण मुळा धरणापेक्षा लहान असून देखील पिण्याचे पाण्यासाठी रोटेशन सोडण्यात आले आहे.