– दत्तात्रय गायकवाड
हवेली तालुक्यात राज्य मार्ग आणि राष्ट्रीय स्तरावरील मार्ग गेले आहेत. याच मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ग्रामीण पोलिसांच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यात आली आहे. मात्र, सध्या तालुक्यात पावसाचे वातावरण आहे. पावसामुळे अनेक रस्त्यावर पाणी साचून नागरिकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने वाहतूक संथगतीने होत असून वाहतूक कोंडीसदृश परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. कोंडीमुक्तीसाठी अधिकाऱ्यांची मानसिकता हवी, असा सूर उमटत आहे.
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सध्या तालुक्यात एकमेव विभाग कार्यरत आहे. तो म्हणजे पोलीस विभाग. ग्रामपंचायत, स्थानिक पदाधिकारी आणि पोलिसांच्या सहकार्यातून रस्त्यावरील पाणी काढून वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे. रस्त्यांच्या कडेला पाणी जाण्यासाठी प्रवाह नसल्याने रस्त्यावरून पावसाच्या पाणी वाहण्याचे प्रमाण वाढले आहेत. त्यात हे पाणी रात्री अपरात्री जाऊन काढणे ही पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. राज्य आणि राष्ट्रीय मार्गाशी निगडित असणाऱ्या निगडित बांधकाम विभागाकडून उपयायोजना गरजेची होती. परंतु अजूनही या विभागांच्या अधिकाऱ्यांना वेळ मिळत नसल्याचे चित्र आहे. रस्त्यांची कामे ज्या ठिकाणी सुरू आहेत. त्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना दिसून येत नाही.
कामे झालेल्या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजवण्यास अधिकारी तसदी घेत नाहीत. स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायत, नागरिक, पोलीस यांच्या मदतीने स्वखर्चाने खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. बांधकाम प्रकल्पाचे कामी अनेकांनी नैसर्गिक स्रोत बुजवले असल्याने पाणी रस्त्यावरून वाहू लागले आहे. पुणे महानगर प्रादेशिक प्राधिकरण यांनी पाहणीशिवाय अजून प्रभावी कारवाई केली नाही. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या मार्गर्शनाखाली सर्व विभागांची संयुक्तिक बैठक झाली तरच वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मदत होईल. पुन्हा एकदा नैसर्गिक स्रोत खुले होऊन पावसाच्या पाण्यासाठी वाट मिळेल. तसेच नागरिकांसाठी रस्ते खुले होतील.