लखनौ – समाजवादी पक्षाला राजकीय ताकत देण्याचा पक्षप्रमुख अखिलेश यादव यांचा प्रयत्न फसल्याने या पक्षाची राजकीय हालत अत्यंत खराब झाली असून त्यांच्या पक्षाला आता राजकीय टॉनिक देण्याची गरज निर्माण झाली आहे अशी टीका उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी केली आहे. याच साठी त्यांनी बहुजन समाज पक्षाशी आघाडी केली असली तरी त्याचा त्यांना काहीं एक लाभ होणार नाही असे भाकीतही त्यांनी केले.
ते म्हणाले की समाजवादी पक्षाने सन 2017 मध्ये कॉंग्रेसशी आघाडी केली होती पण त्यांना त्यावेळीही साफ अपयश आले. त्यामुळे त्यांनी आता बहुजन समाज पक्षाशी आघाडी करून आपले अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न सुरू केला असला तरी त्यांना त्यातही यश मिळण्याची शक्यता नाही. ज्या पक्षाशी अखिलेश यांनी आघाडी केली आहे त्या बहुजन समाज पक्षाला गेल्या लोकसभा निवडणुकीत एकही जागा मिळू शकली नव्हती.
या पक्षाकडून त्यांना काय टॉनिक मिळणार आहे असा सवालही त्यांनी केला. राजकारणात यश मिळवायचे असेल तर विकास कामे करावी लागतात. आणि ती कशी करायची ते अखिलेश यांनी भारतीय जनता पक्षाकडून शिकले पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला. शत्रुघ्न सिन्हा यांनी जिना यांचे केलेल्या कौतुकाचा मुद्दा उपस्थित करून ते म्हणाले की कॉंग्रेस आता महात्मा गांधींचा पक्ष राहिलेला नाहीं तर तो आता जिनांचा पक्ष झाला आहे अशी टीकाही त्यांनी केली.