पुणे- लोकसभेच्या निवडणुकांचा रोमांच शिगेला पोहोचला आहे. राज्यात सध्या प्रचारसभाचा सर्वत्र धडाका सुरू झाला असून अनेक ठिकाणी उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठाणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार आनंद परांजपे यांनी ठाणे येथे तर बाबाजी पाटील यांनी कल्याणमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ठाणे येथे आनंद परांजपे यांच्याविरोधात शिवसेनेचे राजन विचारे हे रिंगणात आहेत. तर कल्याण मध्ये बाबाजी पाटील यांच्यासमोर शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांचे आव्हान असणार आहे.
बाबाजी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
“मागील पाच वर्षांत सरकारने देशातील जनतेसाठी कोणतीही विकासकामे केलेली नसून देशातील कामगार, शेतकरी, नोकरदारवर्गात सरकारविरोधीत प्रचंड रोष आहे. सर्वच ठिकाणचे जनमत हे या सेना-भाजपा सरकारविरोधी आहे, त्यामुळे कल्याण मतदारसंघातून बाबाजी पाटील यांचा विजय निश्चीत आहे.”
-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील