आमच्याकडील अण्वस्त्रे आम्ही दिवाळीसाठी ठेवलेली नाहीत
बाडमेर (राजस्थान) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. राजस्थान मधील बाडमेर येथील जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी नरेंद्र मोदींनी गांधी घराण्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल करत गांधी कुटुंबीयांनी समाधी उभ्या केल्या मात्र, सैनिकांसाठी युद्ध स्मारक बनवता आले नसल्याचा आरोप त्यांनी केला.
पुढे बोलताना नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान हा नेहमीच भारताला त्यांच्याकडे असलेल्या अण्वस्रांची धमकी देत आला आहे. मात्र आता आम्ही अशा धमक्यांना घाबरत नसल्याचे सांगून, आमच्याकडील अण्वस्त्रे आम्ही दिवाळीसाठी ठेवलेली नाहीत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. आम्ही दहशतवाद्यांच्या मनात दहशत निर्माण केली आहे. मागील सरकारच्या धोरणांमुळे पाकिस्तानला खुली सूट मिळाली होती आणि त्यामुळेच देशात दहशतवादी हल्ले होत होते. परंतु आता पाकिस्तान मध्ये घुसून कारवाई होत असल्याचे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
देशाच्या सेना दलातील आधुनिकीकरण यासंदर्भात बोलत नरेंद्र मोदींनी यावेळी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवला. तेजस या विमानाला काँग्रेस पक्षाने वाऱ्यावर सोडून दिले होते, असे म्हणत केवळ पैसे न मिळाल्यामुळेच राफेल विमान करार प्रलंबित ठेवले होते, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.