पुणे: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टी सत्तेत येणार नाही. तसेच या निवडणुकीत मान्यता प्राप्त पार्टी होऊ इतक्या जागा वंचित बहुजन आघाडीला मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देशभरात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची पातळी लक्षात घेता मतदारांनी संतुलन बिघडलेल्या व्यक्तीला पंतप्रधान पदावर बसवू नये, अशी टीका आंबेडकर यांनी केली आहे.
पुण्यातील गंज पेठ येथे महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला आंबेडकर यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांसोबत सवांद साधला.
दुष्काळावर बोलताना आंबेडकर म्हणाले, मी देखील दुष्काळासंदर्भात दौरे करत आहे. मात्र, सत्ताधारी किंवा ५० वर्षे सत्तेत असल्याप्रमाणे मी त्याचे मार्केटिंग करीत नाही. खरं म्हणजे हे मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखा प्रकार आहे.