नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याला संयुक्त राष्ट्र संघाकडून जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये दहशतवादी मसूद अझहरच्या धोरणाबद्दल श्रेयवादाची लढाई सुरू झाली असल्याचे दिसत आहे.
काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि वित्त मंत्री अरुण जेटली यांनी दहशतवादी मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित केल्यानंतर, विरोधकांवर टीका करत भारत सुरक्षित हातांमध्ये असून संयुक्त राष्ट्रांचा हा निर्णय म्हणजे पंतप्रधानांच्या परराष्ट्र धोरणाचा मोठा विजय असल्याचे म्हंटले होते.
त्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी वित्तमंत्री पी चिदंबरम यांनी नरेंद्र मोदी यांचावर टीका करत, काँग्रेसने १० वर्षांपूर्वीच २००९ मध्ये मसूद अझहरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया चालू केली होती असे ते म्हणाले. १० वर्षानंतर ही प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे सांगत पी चिदंबरम यांनी, नरेंद्र मोदी हे एखाद्या चित्रपटाप्रमाणे शेवट दाखवून श्रेय घेत असल्याचे ते म्हणाले.
P Chidambaram, Congress: We started the process in 2009 to name Masood Azhar as global terrorist, 10 years later process is complete. Mr Modi is only talking about last scene of the story, it's like going to a movie & only looking at the last scene, what about the earlier scenes? pic.twitter.com/IscNV0iwfm
— ANI (@ANI) May 4, 2019
शिवाय पुढे बोलताना पी चिदंबरम यांनी मसूद अझहर हा संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला पहिला दहशतवादी नसून, यापूर्वी काँग्रेसच्या काळात हाफिज सईद आणि झकीर उर रहमान लखवी यांना जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले होते याची आठवण यावेळी करून दिली.