मुंबई – अभिनेत्री तनुश्री दत्ताने काही महिन्यांपूर्वी मी टू या मोहिमेअंतर्गत नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला होता. त्यामुळे अभिनेत्री तनुश्री दत्तासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी पाटेकर, नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, सामी सिद्धीकी आणि राकेश सारंग यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात 10 ऑक्टोबर 2018 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मात्र, आता ओशिवरा पोलिसांनी कोर्टात बी समरी अहवाल सादर केला असून त्यात नाना पाटेकर यांच्याविरोधात पुरावे नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नाना पाटेकर यांना दिलासा मिळाला आहे.
2008 साली “हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या एका गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान मोठा गदारोळ झाला होता. या चित्रपटात चित्रीत करण्यात येणाऱ्या गाण्यातील एका दृश्यावर तनुश्रीने आक्षेप घेतला होता. त्यानंतर तिने या चित्रपटातून माघार देखील घेतली होती. यानंतर ती गत काही काळापासून परदेशात वास्तव्यास होती. मात्र, गेल्या वर्षी ती परदेशातून भारतात आली. त्यानंतर तिने मी टू या मोहिमेअंतर्गत नाना पाटेकरांविरोधात लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला होता. मात्र, तनुश्रीने केलेल्या आरोपां संदर्भात कोणतेही ठोस पुरावे नसल्याचे आढळून आले आहे.
यावर प्रतिक्रिया देताना तनुश्री दत्ताने सांगितले की, ती या निर्णयाने थोडीशीही आश्चर्य चकीत झाली नसुन ती या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार आहे. यावेळी तीने सांगितले की, भ्रष्टाचारी पोलिस विभाग हा नाना पाटेकर सारख्या गुंड प्रवृत्तीच्या आणि महिलांना त्रास देणाऱ्या व्यक्तींना पाठीशी घालत आहे. यावेळी तीने सांगितले की, या प्रकरणाशी निगडीत एकाही प्रत्यक्षदर्शी साक्षिदाराचा जबाब न नोंदवता पोलिसांनी या प्रकरणाचा बी समरी रिपोर्ट सादर कसा काय केला. दरम्यान नाना पाटेकर यांनी या पुर्वीच आपल्या वरील सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत.