चेन्नाई – राजीव गांधी हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेली आरोपी नलिनी हीला आपल्या मुलीच्या लग्नाची तयारी करण्यासाठी सहा महिन्याची सुट्टी हवी आहे. या प्रकरणात तिला कोर्टापुढे येऊन आपली बाजू मांडायची आहे. मद्रास उच्च न्यायालयाने तिला तसे म्हणणे सादर करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार 5 जुलै रोजी ती कोर्टापुढे येऊन आपली बाजू मांडणार आहे. राजीव गांधी हत्या प्रकरणात ती गेली 27 वर्षे कारागृहात आहे.
नलिनीला कोर्टापुढे येऊन बाजू मांडण्याचा अधिकार नाकारता येणार नाही असे निरीक्षण कोर्टाने 11 जुनला नमूद केले होते. जन्मठेपेच्या आरोपीला वर्षातून एकदा एक महिन्याची सुट्टी मिळू शकते. पण तिने आज पर्यंत अशी सवलत कधीच घेतली नाही. त्या आधारावर तीने आपल्या मुलीच्या लग्नाच्या तयारीसाठी सहा महिन्याची सुट्टी मागितली आहे.
तिला सुट्टी देण्याची मागणी तिच्या आईनेही केली होती पण कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी ती फेटाळून लावली होती. त्यामुळे तिने हायकोर्टात धाव घेतली आहे. राजीव हत्या प्रकरणात नलिनीला फाशीची शिक्षा झाली होती. पण तामिळनाडु सरकारने 24 एप्रिल 2000 रोजी तिची फाशी रद्द करून ती आजन्म कारागृहात परावर्तीत केली होती.