3 तास थैमान; पोल रिक्षावर पडल्याने एक महिला जखमी झाल्याची घटना
नगर: आज दुपारी झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसाने नगरला चांगलेच झोडपले. सोसाट्याच्या सुटलेल्या वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती. अनेक ठिकाणी होर्डिंग्ज, फ्लेक्स बोर्ड फाटले. विजेच्या तारा तुटल्या त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. नगरचे जनजीवन जवळजवळ विस्कळीत झाले होते.
दुपारपर्यंत वातावरणात उष्मा कायम होता. साधारण 3 वाजेच्या दरम्यान, आकाशात ढगांची गर्दी झाली. गडगडाटासह पावसाच्या टपुऱ्या थेंबांनी पडायला सुरुवात झाल्यानंतर थोड्याच वेळात मुसळधार पावसाने रौद्र रूप धारण केले. पावसाबरोबरच सोसाट्याचा वाराही सुटल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. बंगाल चौक भागात विजेचा पोल रिक्षावर पडल्याने एक महिला जखमी झाली. जिल्हा बॅंकेच्या नावाची अक्षरे खाली पडल्याने तिथे उभ्या असलेल्या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर अनेक ठिकाणची होर्डींगस् वाकली. पत्रकार चौकातील दिशादर्शक फलकानिशी उभारण्यात आलेल्या कमानीचे फ्लेक्स फाटून त्याची लक्तरं वाऱ्यावर लोंबत राहिली. तर पोलीस वसाहतीत झाड पडून घराचे नुकसान झाले. तसेच याच मैदानातील उभारलेल्या शेडचे पत्रे उडाले. अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. उपनगरात तारा तुटल्याने अनेक वसाहतींना आजची रात्र अंधारात घालवाली लागणार आहे.
या पावसामुळे शहराच्या सखोल भागात पाण्याचे तलाव साठले होते. चितळे रस्ता, तेलीखुंट, न्यु आर्ट ऍण्ड कॉमर्स कॉलेज, दिल्ली दरवाजा, सांगळे गल्ली, पटवर्धन चौक, गांधी मैदान, आदी सखल भागांमध्ये पाणी साठल्याने या रस्त्यांतून वाहनांनी मार्ग काढणे जिकरीचे होऊन बसले होते. त्यात अनेक दुचाक्या बंद पडल्या.
या पहिल्याच पावसात महानगपालिकेचा कारभारी उघडा पडला. यापूर्वीच नालेसफाई झाली असती तर पाणी रस्यावरुन वाहिले नसते. मात्र त्या स्वच्छ न केल्याने पाणी रस्त्यावर आले. न्यु आर्टस् ऍण्ड कॉमर्स कॉलेज जवळ गटारीचे पाणी रस्त्यावर आल्याने त्याचा रंग काळाकुट्ट झाला होता, तसेच दुर्गंधीही वाढली होती. मात्र नाईलाजास्तव लोकांना त्यातूनच वाट काढावी लागत होती.
दुपारी 3 च्या दरम्यान सुरू झालेला पाऊस 5 वाजेपर्यंत पडत होता. या पावसाने नगरकरांचे जनजीवन काहीसे विस्कळीत झाले. पण पहिल्याच पावसाने चांगली हजेरी लावल्याने नगरकरही सुखावले.
विजेचा खेळखंडोबा अन् महावितरणचा फोन एंगेज…
दुपारी झालेल्या वादळी पावसाने शहरातील व उपनगरातील काही ठिकाणच्या तारा तुटल्या तर काही ठिकाणी एकमेकांना तारा चिकटल्याने तेथील वीज गायब झाली. मात्र पाऊस थांबल्यानंतर उपनगरातील काही ठिकाणची वीज सायांकळी उशिरा आली. तर शहरातील कोर्ट गल्ली, तेलीखुंट परिसर हा रात्री उशिरापर्यंत अंधारातच होता. काही नागरिकांनी वीज आली नाही, असे कळविण्यासाठी वीज वितरणच्या कार्यालयात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुरुवातीच्या काही फोनना वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी उत्तरे दिली. मात्री नंतर विज वितरणचा टेलिफोन कायम एंगेज लागत राहिल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला.
…सुदैवाने जीवित हानी टळली, वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात
आजच्या पावसाने रौद्ररूप धारण करून शहरात अनेक ठिकाणी झाडे, विजेचे पोल, होर्डींगस् कोसळली. मात्र कोठेही जीवित हानी झाली नाही. जिल्हा बॅंकेच्या नावाची अक्षरे कोसळल्याने आवारात उभ्या असलेल्या चार चाकी वाहनांची मोठ्या प्रमाणावर मोडतोड झाली. तसेच बंगाल चौक येथे पथदिव्यांचा पोल रिक्षावर पडल्याने रिक्षाचे मोठे नुकसान झाले. या घटनेत एक महिलाही जखमी झाली. पोलीस मुख्यालयातील इमारतींचे पत्रे उडाल्याने तेथेही मोठी वित्तीय हानी झाली आहे. पत्रकार वसाहतीजवळील मोठे होर्डींगस् वाकल्याने, तसेच शेजारच्याच व्यापारी संकुलातील बोर्ड पडल्याने या ठिकाणी देखील बरेच नुकसान झाले मात्र, या सर्व ठिकाणी सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.