राज्य सरकार न्यायालयात माहिती
न्यायालयाने याचिका निकाली काढली
मुंबई – मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम योग्य पध्दतीने सुरू असून महामार्गाचे काम समाधानकारकपणे होत असल्याचा अहवाल न्यायालयात सादर झाल्यामुळे या संदर्भात दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने आज निकाली काढली. तसेच या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात काही कसूर आढळल्यास पुन्हा दाद मागण्याची मुभा याचिकाकर्त्यांना दिली.
मुंबई गोवा महामार्ग क्र 66 या महामार्गावरील खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयातील वकील ऍड.ओ.ए. पेचकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्या. प्रदीप नंदराजोग आणि न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित येणाऱ्या महामार्गवरील रस्त्यांचे काम न्यायालयाचे आदेश आणि निर्देशानुसार चालू असून काम प्रगतीपथावर आहे. तसेच 2020 पर्यंत काम पूर्ण होणार असल्याची माहिती ऍड. निशा मेहरा यांनी
न्यायालयाला दिली. त्याला याचिकाकर्त्यांनी दुजोरा दिला. याची दखल घेऊन न्यायालयाने याचिका निकाली काढली.