मुंबई – आयटीआय विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ कार्यक्रम आयोजित करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले असून याची नोंद आशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. आज महाराष्ट्राने बनवलेले कौशल्य धोरण अत्यंत उपयुक्त असे ठरत असून गेल्याच आठवड्यात झालेल्या रँकिगमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक स्टार्ट अप आल्याची नोंद आहे, अशी माहिती कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी सांगितली.
जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून उत्तीर्ण होणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना पदवी प्रदान करणे, उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था व सहभागी औद्योगिक संस्थांना सन्मानित करण्याचा कार्यक्रम आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना निलंगेकर म्हणाले, ‘आज शासकीय आयटीआयचे आधुनिकीकरण होत असताना कॉर्पोरेट कंपन्या आयटीआयला ॲडॉप्ट न करता आयटीआयबरोबर हँड होल्डिंग करीत आहेत ही जमेची बाजू आहे. आज आयटीआयचे सक्षमीकरण करीत असताना आयटीआय परीक्षा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत तर रोजगारक्षम अभ्यासक्रम तयार करण्यात महाराष्ट्राला यश आले आहे.