मुुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूने असलेली एखादी शक्ति त्यांच्या विरोधात गेल्यास त्या शक्तिला आतंकवादी ठरवण्याचा, त्याच्याविरोधात आरोप करण्याची नीती वापरली जाते, असा हल्लाबोल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या खेतवाडी येथील प्रचारसभेत बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान यांना लक्ष्य केले. पाच वर्षांत मोदी यांची हुकुमशाही पाहायला मिळत आहे. मोदी राज्यात आले आणि शरद पवार यांच्यावर बोलले असे सध्या होत नाही. यापूर्वी, तुम्ही सोबत आहात, आम्हाला छान वाटत आहे, असे मोदी बोलत होते आणि आज मी विरोधात भूमिका घेतल्यावर मला वाईट बोलत आहेत, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.
पाच वर्षांत देशाची अवस्था वाईट झाली आहे, असे सांगत विकास हेच लक्ष आहे सांगणारे नंतर हिंदू धोक्यात आहे असे बोलू लागले आणि हिंदू आतंकवाद सुरु केला, असा आरोप पवारांनी केला. कॉंग्रेसने कधीच धर्माच्या नावाखाली हिंदू धर्मावर अन्याय केला नाही. आज मोदींनी जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्र्यांना आतंकवादी ठरवलेय. पण यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्ला यांच्या पक्षासोबत भाजप होती. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात फारुख अब्दुल्लासुध्दा होते, मग अब्दुल्ला आतंकवादी कसे, असा सवालही शरद पवार यांनी उपस्थित केला.
गांधी घराण्याची पाठराखण
शरद पवारांनी यावेळी गांधी घराण्याची पाठरखण केली. गांधी-नेहरु घराण्यावर मोदींचा नेहमी हल्ला सुरु असतो. त्यांनी देशासाठी काय केले असे ते विचारत आहेत. पण मोदींना माहित नसेल की नेहरू हे 11 वर्ष तुरुंगात राहिले आहेत. भारतात हुकुमशाही आली नाही, कारण नेहरुंनी दाखवलेला मार्ग चांगला होता. इंदिराजींनी इतिहास नाही तर भूगोल बनवला हे जगाला दाखवून दिले. राजीव गांधी यांनी मोबाईल क्रांती केली आणि हे विचारतात त्यांनी काय केले. या परिवाराचा हा देश उत्तरदायित्व आहे. राहुल गांधी यांचे वडील, आजी यांनी देशासाठी बलिदान दिले आहे, आणि हे विचारत आहेत त्यांनी काय केले, असेही पवार म्हणाले.