रोज संध्याकाळपर्यंत नावं देण्याचे आदेश
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची शाळा घेणार असल्याचे दिसत आहे. त्यासाठी त्यांनी सभागृहात गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची रोज संध्याकाळी नावे दिली जावीत असा आदेश दिला आहे. दिल्लीत मंगळवारी भाजपाच्या संसदीय दलाची बैठक पार पडली. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शाह, कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासहित अनेक नेते उपस्थित होते. बैठकीत नरेंद्र मोदींनी लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांना संबोधित केले.
Union Minister Pralhad Joshi after BJP Parliamentary Party meeting today, in Delhi: As usual, Prime Minister has urged…he has said that there are no exceptions from being present in Parliament while the session is on. It is compulsory for everyone to be present. pic.twitter.com/huKe9XO6Zd
— ANI (@ANI) July 16, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बैठकीत संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांना संध्याकाळपर्यंत गैरहजर मंत्र्यांच्या नावाची यादी देण्यास सांगितले आहे. तसेच खासदारांना फक्त राजकारणाशी संबंधित राहता कामा नये. त्यांना राजकरणाव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्येही सहभागी झाले पाहिजे. देशासमोर पाण्याचे मोठे संकट आहे. त्यासाठीही खासदारांनी काम केले पाहिजे असेही नरेंद्र मोदींनी योवळी म्हटले. आपल्या परिसरातील अधिकाऱ्यांसोबत बैठक करुन जनतेच्या समस्यांवर चर्चा केली गेली पाहिजे. खासदार आणि मंत्र्यांनी संसेदत उपस्थित असणे गरजेचे आहे, असेही नरेंद्र मोदींनी यावेळी म्हटले. जे मंत्री उपस्थित असणं अपेक्षित असतानाही गैरहजर असतील त्यांची नावं त्याच संध्याकाळी मला दिली जावीत असा आदेश यावेळी नरेंद्र मोदींनी दिला.