मुंबई – वर्धा येथील जाहिर सभेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि पवार कुटुंबावर जोरदार हल्लाबोल करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. रिकाम्या खुर्च्या बघून मोदींचा रागाचा पारा चढला आणि त्यांनी पवार कुटुंबीय व राष्ट्रवादी कॉंग्रेसला टार्गेट केल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.
शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले असे मोदी विचारत आहेत, परंतु पवार यांनी देशात आणि राज्यात शेतकऱ्यांसाठी काय केले आहे हे जगजाहीर आहे. पण 5 वर्षांत मोदींनी काय केले याचे उत्तर मोदींनी द्यावी, असे आव्हान नवाब मलिक यांनी दिले. भाजप हा शेतमालाचे उत्पादन करणारा नाही तर शेतमालाची लुट करणारा पक्ष आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पाच वर्षात न्याय देवू शकले नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कौटुंबिक लढाई सुरु आहे. शरद पवारांचे पुतणे राष्ट्रवादीवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. अजित पवारांच्या हातून शरद पवार “हिट विकेट’ झाले आहेत, पंतप्रधानांच्या या आरोपालाही नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमची विकेट जाणार असे बोलत आहात. परंतु सभेचे मैदान रिकामे होते याचा अर्थ जनताच तुमची विकेट घेणार आहे. इतरांकडे बोटे दाखवण्यापेक्षा आजच्या सभेचा राग तुम्हाला आला. त्यातूनच तुम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि अध्यक्ष शरद पवार यांच्यावर काढला आहे. परंतु तुम्ही कितीही राग काढला तरी जनताच 23 मे रोजी तुमची विकेट घेणार आहे असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसची परंपरा वडीलधारी आणि वयस्कर लोक आहेत. ज्येष्ठ नेते आहेत. शरद पवार आमचे अध्यक्ष आहेत. त्यांचा आदर आमचा कार्यकर्ता ठेवतो. परंतु तुमचे नेते लालाकृष्ण अडवाणी यांनी तुम्हाला राजकारणात आणले, तुम्हाला मुख्यमंत्री केले. नेता केला आणि आज त्यांची हालत तुम्ही काय करून ठेवलीत, हे देश बघतोय असा टोलाही नवाब मलिक यांनी पंतप्रधानांना लगावला.