नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाने अलिकडेच आपला निवडणूक जाहीरनामा प्रकाशित केला आहे त्यावर टीका करताना कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे की मोदींचा हा जाहीरनामा म्हणजे एकट्या पडलेल्या माणसाचा आवाज आहे. मोदी हे लघुदृष्टीचे आणि उर्मट राजकीय नेते आहेत अशी टीकाही त्यांनी केली आहे.
त्यांनी आपल्या ट्विटरवर म्हटले आहे की कॉंग्रेसचा जाहींरनामा हा लक्षावधी भारतीयांशी संवाद साधून त्यांच्या इच्छा, आकांक्षानुसार तयार करण्यात आला आहे, त्यामुळे तो व्यावहारिक आणि शक्तीशाली झाला आहे. त्या उलट भाजपचा जाहीरनामा बंद खोलीत तयार करण्यात आला आहे. तो एकट्या पडलेल्या माणसाचा आवाज आहे. त्यात उद्दामपणाही आहे असे त्यांनी म्हटले आहे.
भाजपचा जाहीरनामा म्हणजे एक झांसा पत्र असून त्यात खोटारडेपणाचेच बुडबुडे आहेत अशी टीका कॉंग्रेसने सोमवारीच केली आहे. भाजपने संकल्पपत्र जाहीर करण्याऐवजी माफीपत्र सादर करायला पाहिजे होते असे त्यांनी म्हटले आहे.