भारताशी चर्चेच्या आशेतून दिली तत्वत: मान्यता
लाहोर -भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विमानप्रवास पाकिस्तानी हवाई हद्दीतून होणार आहे. त्यासंदर्भात भारताने केलेली विनंती पाकिस्तानने तत्वत: मान्य केली आहे.
किरगिझस्तानची राजधानी बिश्केकमध्ये 13 आणि 14 जूनला शांघाय सहकार्य संघटनेची (एससीओ) परिषद होणार आहे. त्या परिषदेला मोदी उपस्थित राहणार आहेत. त्या परिषदेला जाण्यासाठी मोदींच्या विमानाला पाकिस्तानी हवाई हद्दीतून जाण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती भारताकडून करण्यात आली होती. ती मान्य करताना पाकिस्तानने शांतता चर्चेसाठी आम्ही दिलेला प्रस्ताव भारत स्वीकारेल, अशी आशा व्यक्त केली आहे.
मोदींच्या विमानप्रवासासंदर्भात घडलेल्या सकारात्मक घडामोडीमुळे भारत आणि पाकिस्तानमधील ताणले गेलेले संबंध सुरळित होण्यास हातभार लागणार का, ते आगामी काळात स्पष्ट होईल. पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेने फेब्रुवारीत जम्मू-काश्मीरच्या पुलवामात भयंकर आत्मघाती हल्ला घडवला. त्या दुष्कृत्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून जैशचा अड्डा उद्धवस्त केला. त्यानंतर दोन्ही देशांच्या हवाई दलांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली.
तणाव शिगेला पोहचल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने 26 फेब्रुवारीला स्वत:ची हवाई हद्द इतर देशांच्या विमानांसाठी पूर्ण बंद केली. तसे असतानाही पाकिस्तानने याआधी 21 मे यादिवशी भारताच्या तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना बिश्केकला जाण्यासाठी आपली हवाई हद्द वापरण्याची परवानगी दिली होती. त्या एससीओच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी बिश्केकला गेल्या होत्या. आता मोदींच्या विमानासाठीही हवाई हद्द वापरण्याची परवानगी पाकिस्तानने दिली आहे.