नागपुर – या लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनणार नाहींत असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. आज येथील एका सभेत बोलताना ते म्हणाले की नागुपरातील भाजपचा उमेदवारही पंतप्रधान बनू शकणार नाही असे त्यांनी गडकरी यांचे नाव न घेता नमूद केले. देशात भाजपच्या विरोधात मोठी लाट असून त्यांना दीडशेच्यावरही जागा जिंकता येणार नाहींत असे त्यांनी सांगितले. त्यामुळे येत्या 23 मे नंतर देशात मोदी हे पंतप्रधानपदावर दिसणार नाहीत असे आपण ठामपणे सांगू इच्छितो असे ते म्हणाले.
स्वता गडकरीही कॉंग्रेस उमेदवाराकडून नागुपरात पराभूत होणार आहेत असे ते म्हणाले. नागपुर मतदार संघात कॉंग्रेस उमेदवार नाना पटोले यांना विजयाची मोठी संधी असल्याचेही त्यांनी नमूद केले. कॉंग्रेसच्या काळातच नागपुरचा मोठा विकास झाला असा दावा करून चव्हाण यांनी नमूद केले की मिहान प्रकल्प आणि नागपुरातील मेट्रो प्रकल्पाचे श्रेय कॉंग्रेसलाच जाते. ऍडव्हान्टेज विदर्भ योजनेतून आम्ही विदर्भात मोठे औद्योगिक प्रकल्प आणले असा दावाही त्यांनी केला.