नवी दिल्ली: गुरुवारी लोकसभेच्या निवडणुकीतील अभूतपूर्व विजय नोंदवल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची भेट घेतली. दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरलेल्या या दोन्ही नेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. सशक्त आक्रमक राष्ट्रवाद, सुरक्षा आणि हिंदू अस्मितेच्या मुद्दयांवरील सरकारच्या भूमिकेमुळेच ही विजयश्री खेचून आणली गेली आहे. भाजपच्य विचारधारेला नव्याने जनतेपुढे सादर करण्यानेच हा विजय मिळाला आहे, असे मोदींनी ट्विटरवर म्हटले आहे.
काल मतमोजणी संपत आली असतानाच मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला 302 जागा मिळाल्याचे स्पष्ट झाले होते. गुरुवारी सकाळी मतमोजणी सुरू झाली आणि सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्येच भाजपला मिळालेली आघाडी अखेरपर्यंत कायम राहिली होती. 2014 च्या निवडणुकीत भाजपला 282 जागा मिळाल्या होत्या. मात्र यंदा हा आकडाही भाजपने मागे टाकला आणि 350 पर्यंत मजल गाठली.