कन्नुर – नरेंद्र मोदी यांनी देशांतर्गत संघर्ष पेटवून देश तोडण्याचा प्रयत्न चालवला आहे अशी टीका कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. पक्षाच्या संसदीय समन्वय समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला. देशातील वाढती बेरोजगारी हे मोदी सरकारच्याच बेजबाबदार अर्थकारणाचे फलित आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याची ग्वाही देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण खूप वाढले आहे असेही ते म्हणाले. दर 24 तासात देशातील 27 हजार युवकांच्या नोकऱ्या जात आहेत असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले.
ते म्हणाले की आज देशातील कृषी क्षेत्रापुढे प्रचंड आव्हान निर्माण झाले असून देशाचे आर्थिक मागासलेपणही वाढले आहे. पण त्या प्रश्नावर लक्ष देणे सोडाच पण त्यावर बोलणे सुद्धा मोदी टाळत आहेत. ते पत्रकारांशीही बोलायला टाळतात असे ते म्हणाले. केरळातील दोन दिवसांच्या प्रचारासाठी राहुल गांधी येथे आले आहेत. केरळात येत्या 23 एप्रिल रोजी सर्व 20 लोकसभा मतदार संघात निवडणुका होत आहेत. स्वता राहुल गांधी हे वायनाड मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. या राज्यात सत्तारूढ डावी आघाडी आणि कॉंग्रेस प्रणित युडीएफ यांच्यात प्रमुख लढत होत आहे.