चेन्नाई – नरेंद्र मोदी हे पंडित नेहरू आणि राजीव गांधी यांच्याच तोडीच्या करिष्म्याचे नेते आहेत असे प्रतिपादन तामिळी सुपरस्टार रजनीकांत यांनी केले आहे. पक्षाच्या पराभवामुळे खचून जाऊन राहुल गांधी यांनी राजीनामा देणे गरजेचे नाही असेही त्यांनी म्हटले आहे. राहुल गांधी हे अजून तरूण आहेत आणि कदाचित त्यांना पक्षाच्या अन्य वरीष्ठ नेत्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नसेल म्हणून त्यांना पराभवला सामोरे जावे लागले असेल असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
देशात मोदींचा मोठा करिष्मा दिसून आला असून ते जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, वाजपेयी, कामराज, सी. एन. अन्नादुराई, एम. जी. रामचंद्रन, करूणानिधी, जयललिता अशा दिग्गज नेत्यांच्याच तोडीचे नेत आहेत असेही रजनीकांत यांनी म्हटले आहे. लोकसभेतील भाजपला मिळालेला विजय हा मोदींच्या व्यक्तीगत करिष्म्याचा विजय आहे असे त्यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
भारतीय राजकारणात कोणत्याही पक्षाला विजय तेव्हाच मिळतो जेव्हा त्यांच्या पक्षाचा नेते लोकप्रियतेची नवी उंची गाठत असतो. अशी उंची मोदींनी गाठली आहे. देशात मोदी लाट दिसून आली तरी केरळ आणि तामिळनाडुत मात्र भाजपला मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे असे त्यांनी निदर्शनाला आणून दिले.