नवी दिल्ली – पंतप्रधान मोदींनी सरकारी कंपन्यांचे प्रचंड नुकसान केले. सरकारी कंपन्या त्यांनी खासगी कंपन्यांना वाव देण्यासाठी मोडीत काढल्या. सरकारच्या कंपन्यांचे हित धोक्यात आणून मोदींनी देशद्रोह केला आहे असा आरोप कॉंग्रेस नेते नवज्योत सिद्धु यांनी केला आहे. मोदींचा उल्लेख त्यांनी निक्कम्मा असा केला.
राष्ट्रवादाच्या विषयावर मते मागण्याचे काम मोदींनी बंद करावे आणि देशहिताच्या बाबींचे मुद्दे उपस्थित करावेत असे आव्हान त्यांनी मोदींना दिले. आज येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा दावा केला. मोदी हे अडाणी आणि अंबानीचे व्यवसायिक व्यवस्थापक आहेत त्यांनी सरकारी कंपन्यां मोडीत काढून या उद्योगपतींची घरे भरली असा आरोपही सिद्धु यांनी आज पत्रकार परिषदेत केला. सिद्धु हे पंजाब मधील कॉंग्रेस सरकारचे मंत्री आहेत.
पेटीएम आणि रिलायन्स जिओ साठी मोदींनी एसबीआय आणि एमटीएनएल या कंपन्या खड्ड्यात घातल्या असे ते म्हणाले. अडाणी आणि अंबानी यांना घेऊन मोदी अनेक वेळा विदेश दौऱ्यावर गेले. विदेशातून मिळालेली अठरा मोठी कंत्राटे त्यांनी सरकारी कंपन्यांना न देता खासगी कंपन्यांना दिली असा आरोपही त्यांनी केला. देशाच्या चौकीदाराने केवळ एक टक्का श्रीमंतांचेच भले पाहिले आणिक्ष देशातील 99 टक्के जनतेला त्यांनी वाऱ्यावर सोडले असा आरोपही त्यांनी केला.