पुणे – गेल्या पाच वर्षात मोदींच्या आर्थिक धोरणामुळे गरीब अधिक गरीब झाले आणि श्रीमंत अधिक श्रीमंत झाले. दलित, मागासवर्गीय, आदिवासी, भटके विमुक्त, अल्पसंख्यांक यांच्यावरही अत्याचार होत राहिले यासाठी नरेंद्र मोदी सरकार आता सत्तेवरून दूर करून शाहू फुले आंबेडकर विचारांचे कॉंग्रेस व मित्र पक्षांचे सरकार केंद्रात आणायचे आहे, असा विश्वास कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी व्यक्त केला.
गुरूवारी सायंकाळी लोहियानगर येथून सुरू झालेल्या रॅलीच्या समारोपानंतर केले. या पदयात्रेत कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ प्रवक्ते खासदार हुसेन दलवाई आणि कॉंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील हे देखील काहीवेळ सहभागी झाले होते.
गेली पाच वर्षे खोटे बोलून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या मोदी सरकारला सत्तेवरून घालवावेच लागेल, अशा शब्दांत खासदार वंदना चव्हाण यांनी टीका केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्रपक्षांनी गुरूवारी निदर्शने केली.
खासदार वंदना चव्हाण, आमदार शरद रणपिसे, दीप्ती चवधरी, उल्हास ढोले पाटील, कमलताई ढोले, ऍड.अभय छाजेड, डॉ. सतीश देसाई, प्रशांत जगताप, कमल व्यवहारे, अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला, राजलक्ष्मी भोसले, रजनी त्रिभुवन, दत्तात्रय गायकवाड, रवींद्र धंगेकर, मुकारी अलगुडे, वीरेंद्र किराड, बाळासाहेब अमराळे, रवी चौधरी, बुवा नलावडे, नीता रजपूत, मुख्तार शेख, लक्ष्मीबाई, कांबळे, जयसिंग भोसले, डॉ. सुनीता मोरे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दगडूशेठ गणपती मंदिराजवळ समारोप करण्यात आला.
पुण्यात कॉंग्रेसचा विजय सुकर
पुणे शहरातील विविध समविचारी राजकीय पक्ष आणि असंख्य पुरोगामी विचारांच्या संघटनांनी आपल्याला दिलेल्या पाठिंब्यामुळे पुण्यात कॉंग्रेसचा विजय अधिक सुकर झाला आहे, असे जोशी म्हणाले. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात रॅली आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर ते बोलत होते.
लोकशाही वाचवण्यासाठी लढाई : चव्हाण
ही निवडणूक म्हणजे लोकशाही वाचवण्यासाठीची अंतिम लढाई आहे. अनेक भूलथापा देऊन सत्तेवर आलेले मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे,असे मत कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. यावेळी मोहन जोशी, साहिल केदारी, माजी मंत्री नितीन राऊत आदी उपस्थित होते.