बीड – केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने राबविलेल्या शेतकरी धोरणामुळे राज्यातील जनतेला पाण्याच्या दुष्काळापेक्षा मोदी दुष्काळाची सर्वाधिक झळ बसली आहे. तसेच देशाची लोकशाही धोक्यात आहे. पण आता असे होणार नाही, अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी मोदींवर टीका केली. 2014 मध्ये मोदी लाट होती. मात्र, 2019ला कॉंग्रेस राष्ट्रवादीचं वादळ आहे. यात कमळाच्या पाकळ्या राहणार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगाविला.
बीडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमदेवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी धनंजय मुंडे, माजी मंत्री सुरेश नवले, बजरंग सोनवणे, माजी आमदार उषा दरडेंसह इतर नेतेमंडळी उपस्थित होते.
धनंजय मुंडे म्हणाले, मोदी सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णयामुळे जनतेसह उद्योजकांना मोठा फटका बसला आहे. यामुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. तसेच जीएसटीच्या निर्णयामुळे व्यापारीवर्ग नाराज आहे. आता या सरकारला सत्तेतून हद्दपार करण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.
बहुतेक मोदी साहेबांना विस्मरणाचा रोग निर्माण झाला असावा? प्रचारानिमित्त महाराष्ट्र येतात तेव्हा पवार साहेबांवर टीका करतात आणि निवडणूक संपली की मोदींना पवार साहेबांची करंगळी आठवते, असेही धनंजय मुंडे म्हणाले.
काल पंकजा मुंडेंनी घटना बदलायची आहे. त्यामुळे खासदार म्हणून निवडून द्या, असे आवाहन केले होते. त्या पंकजा मुंडेंना घटना बदलणं चिक्की खाण्याएवढं सोपं नाही, असा टोला त्यांनी लगावला.