बीना (मध्यप्रदेश) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सरकारच्या कामगिरीबाबत बोलू शकत नाहीत. म्हणूनच इतिहासात घडलेल्या घटनांचा संदर्भ देत आहेत, असे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. सत्ताधारी भाजपला निरोप देण्याची वेळ आता आली आहे, असेही ते म्हणाले. मध्यप्रदेशातील बीना इथे प्रचारसभेमध्ये ते बोलत होते. पंतप्रधानांनी केलेल्या संबंधित शेरेबाजीचा थेट उल्लेख राहुल गांधी यांनी केला नाही. मात्र मोदींकडून निवडणूक प्रचारदरम्यान सातत्याने गांधी कुटुंबीयांबाबत केल्या जाणाऱ्या टीकेकडेच त्यांचा रोख होता.
रोजगार, शेतकरी, प्रत्येकाच्या बॅंकांमध्ये 15 लाख रुपये जमा करणे आणि अच्छे दिन यासारख्या मुद्दयांबाबत बोलू शकत नाहीत. ते केवळ इतिहासाबाबतच बोलू शकतात. मोदींना 5 वर्षांपूर्वीच पंतप्रधान म्हणून निवडले आहे. पूर्वी काय झाले किंवा इतरांनी काय केले, याबाबत लोकांना तुमच्याकडून काहीही ऐकायचे नाही. तुम्ही काय केले आणि पुढे काय करणार आहात, हे लोकांना ऐकायचे आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
राफेल विमान खरेदी व्यवहारात मोदींनी उद्योगपती अनिल अंबानी यांना 30 हजार कोटींचे कंत्राट मिळवून दिले. हा एक गैरव्यवहारच असल्याच्या आरोपाचा गांधी यांनी पुनरुच्चार केला. आपण एकटेच देश चालवतो, असे मोदींना वाटते. नात्र प्रत्यक्ष्यात देशातील जनता देश चालवते आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.
कॉंग्रेस पक्षाने निवडणूक जाहीरनाम्यामध्ये गरिबांना किमान हमी उत्पन्न म्हणून दरवर्षी 72 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचाही राहुल गांधी यांनी पुनरुच्चार केला. कॉंग्रेस पक्ष सत्तेत आल्यास केंद्र सरकारी सेवेतील 22 लाख रिक्त पदे भरण्याचे आश्वासनही राहुल गांधी यांनी यावेळी दिले.