अभद्र टिपण्णीबद्दल भाजपकडून निषेध
लखनौ – उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी आज पंतप्रधानांवर अत्यंत जोरदार टीकास्त्र सोडले. पंतप्रधान मोदींनी केवळ राजकारणासाठी आपल्या पत्नीला सोडले असा आरोप त्यांनी केला आहे. आपला पती मोदींच्या जवळ जाऊ नये असे भाजपमधील महिलांना कायम वाटत असते कारण मोदींप्रमाणे आपले पतीही आपल्याला सोडून देतील अशी भीती त्यांच्या मनात असते असे आक्षेपार्ह विधानही मायावती यांनी केले आहे. त्यांच्या या विधानावर भाजपने जोरदार आक्षेप घेतला असून त्यांनी त्यांच्या या टिपण्णीचा निषेधही केला आहे.
मायावती यांनी आज एक निवेदन प्रसिद्धीला दिले आहे त्यात त्यांनी मोदींवर ही टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की देशातल्या कोणत्याही महिलेने मोदींना मत देऊ नये. मोदींनी सोडलेल्या पत्नीचा सन्मान व्हावा असे वाटत असेल तर भारतातील कोणत्याही महिलेने त्यांना मत देऊ नये असे आवाहनही त्यांनी देशातील महिलांना केले आहे. राजस्थानातील अल्वार येथे दलित महिलेवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणातही मोदींनी गलिच्छ राजकारण केले आहे अशी टीका त्यांनी मोदींवर केली आहे.
या प्रकरणी ते या विषयावरून ते गलिच्छ राजकारण करीत आहेत असा आरोप त्यांनी केला. बलात्कारासारख्या विषयावरून राजकारण करणे हे लाजीरवाणे आहे असे त्यांनी म्हटले आहे. ज्या व्यक्तीने राजकारणासाठी स्वताची पत्नी सोडली तो इसम दुसऱ्याच्या माता भगीनींचा काय सन्मान करणार असा सवालही मायावती यांनी केला आहे. अल्वार येथील सामुहिक बलात्कार प्रकरणावरून मायावती यांनी राजस्थानातील कॉंग्रेस सरकारचा पाठिंबा का काढून घेतला नाही असा सवाल पंतप्रधान मोदींनी मायावती यांना विचारला होता. त्यावर मायावती यांनी ही संतप्त प्रतिक्रीया दिली आहे.