मुंबई – आता मतदार केंद्रावर मोबाईल घेऊन जाणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. फक्त मोबाईलच नव्हे तर कोणतंही इलेक्ट्रॉनिक उपकरण मतदान केंद्राच्या 100 मीटर अंतरावर नेऊ नये, अशी सक्त ताकीद निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकांमध्ये मतदान केंद्रामध्ये मोबाईलने शुटिंग करून गुप्त मतदानाच्या संकल्पनेला हरताळ फासण्यात आला होता. म्हणून निवडणूक आयोगाने ही खबरदारी घेतली आहे.
लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात मतदानाची पद्धत गुप्त राखण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्रात मोबाईल बंदीचा निर्णय घेतला आहे. मतदान केंद्रात जाताना मतदारांना मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मतदारांना तसे आवाहन केले आहे. लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात मतदानावेळी झालेले फेसबुक लाईव्ह आणि तिसऱ्या टप्प्यातील टिकटॉकच्या प्रकारानंतर निवडणूक आयोगाने ही खबरदारी घेतली आहे.