पारंपरिक खेळांना सुट्टी : मुलांचा शारिरिक विकास खुंटला
– शेरखान शेख
शिक्रापूर – सध्या मोबाइलचे युग असल्यामुळे मुलांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वांच्या हातामध्ये आढळून येणारा मोबाइल झाला आहे. मोबाइल म्हणजे मानवी जीवनातील एक अविभाज्य घटक बनला आहे; परंतु या मोबाइलमध्ये युवक वर्ग व लहान मुले गुंतली गेली आहे. मुलांचे सुट्टयांच्या काळातील सर्व जुने खेळ कालबाह्य होत चालले आहेत. पुढील काळातील मुलांना खेळ म्हणजे काय, हे सांगावे लागणार असल्याची स्थिती निर्माण झालेली आहे.
शालेय जीवनात मुलांना सुट्टया लागल्यानंतर आता आपल्याला भरपूर खेळ खेळता येणार, या आनंदाने मुले बागडत असतात. शाळेला सुट्टट्या लागताच अनेक ठिकाणी मुले क्रिकेट, विट्टी- दांडू, गोट्या, लिंगोरचा, आपारापी, लपाछपी, सूरपारंब्या, कब्बडी, खो खो, झोके, पतंग उडविणे, भिंगरी खेळणे यांसह आदी प्रकारचे पारंपारिक प्रकारचे खेळ खेळत होते. दुपारी पोहण्याचा आनंद घेत असत. प्रत्येक ठिकाणी लहान मुले खेळ खेळताना दिसून येत होते. त्यावेळी मुलांना खेळण्याच्या गडबडीमध्ये दिवसभराचा वेळ देखील कमी पडत होता. दिवसभर विविध खेळ खेळल्यामुळे मुलांमध्ये शारीरिक व्यायाम आपोआप घडत होता. त्यामुळे मुले शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहत होते. सायंकाळी पालकांना मुलांना शोधून घरी बोलवावे लागत होते.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुले रानामध्ये जाऊन कच्च्या कैऱ्या, चिंचा गोळा करून आणण्याकडे आकर्षित होत होते. त्यामुळे मुलांना झाडांना कधी कैऱ्या लागतील, असे वेध लागलेले होते. परंतु सध्याच्या मोबाइलच्या काळामध्ये सर्व मुले मोबाइलमधील विविध प्रकारच्या गेममध्ये रमून गेलेली असल्यामुळे कोठेही मुले कोणते खेळ खेळताना दिसून येत नाहीत. सर्वत्र मैदाने मोकळी पडलेली दिसून येत आहेत. झाडांवरील कैऱ्या झाडांवर राहिलेल्या आहेत. पालकांना मुलांना शोधण्याची वेळ गेलेली आहे. मुले घरातच मोबाइलमध्ये गेम खेळताना दिसत आहेत. सध्याच्या मुलांना जुन्या खेळांबाबत कोणतीही माहिती नसून सर्व खेळ मुलांना समजावून सांगावे लागत आहेत. त्यामुळे पुढील काळामध्ये मुलांना हे खेळ समजू शकतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जुने खेळ कालबाह्य होत असल्याचे दिसून येत आहे.
लहान मुलांसाठी मोबाइलवर असलेल्या गेम मुळे मुलांचा बौद्धिक विकास होतोय परंतु शारीरिक विकास होत नाही. मुले कमजोर होतात. परंतु जुन्या काळातील विविध मैदानी खेळांमुळे त्यांचा शारीरिक विकास होतो. मुले तंदुरुस्त राहतात. त्याचा त्यांना पुढील काळामध्ये शरीरासाठी उपयोग होतो. त्यामुळे मुलांना मैदानी खेळांची आवश्यकता गरजेची आहे.
– प्रकाश घोलप
क्रीडा प्रशिक्षक, शिक्रापूरसध्या वेगवेगळ्या गेमची मुलांना भुरळ पडत आहे. मुलांचे जुन्या खेळांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मुलांचा शारीरिक विकास खुंटला आहे. मुलांना विविध आजारांच्या व्याधी निर्माण झाल्या आहेत. मुलांनी शारीरिक खेळांना महत्व देणे गरजेचे आहे.
– अनिल व्यवहारे, शिक्षक, शिक्रापूर जिल्हा परिषद शाळा, कोयाळी पुनर्वसन