मुंबई: राज्यातील अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के प्रवेश कोटा असतो, मात्र मुंबईतील एचआर,जयहिंद व केसी कॉलेजसह इतर नामांकित महाविद्यालयांमध्ये तेवढे विद्यार्थी उपलब्ध होत नाहीत म्हणून शिक्षण उपसंचालकांशी संगनमत करून उर्वरित कोट्यात घोटाळा केला जात असल्याची गंभीर माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहासमोर आणली.
मुंबईतील एचआर, जयहिंद, केसी व अशा नामांकित महाविद्यालयात अल्पसंख्याक कोट्यातील फक्त ५ ते १० टक्के प्रवेश त्या त्या भाषिक अल्पसंख्याकातून करण्यात येतात तर उर्वरित ४० ते ४५ टक्के प्रवेश हे आर्थिक देवाणघेवाण करुन प्रती विद्यार्थी ४ ते ५ लाख घेऊन प्रवेश करण्यात येत असल्याचा आरोप मुंडे यांनी केला.
शासनाची दिशाभूल करुन अल्पसंख्यांकांच्या राखीव जागेवर आर्थिक व्यवहार करुन प्रवेश देणार्याा महाविद्यालयांवर व शिक्षण उपसंचालकावर गुन्हे दाखल करावा व संबंधित महाविद्यालयांचा अल्पसंख्याक दर्जा काढून घेण्यात यावा अशी मागणीही मुंडे यांनी केली.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी मांडलेल्या लक्षवेधीनंतर या प्रवेश घोटाळ्याची चौकशी करण्यात येईल अशी माहिती शिक्षणमंत्री आशिष देसाई यांनी सभागृहात दिली.