नवी दिल्ली – सरकारच्या अनुदानावर अवलंबून न राहता उद्योग अधिक स्वयंपूर्ण आणि स्पर्धात्मक करण्यासाठी परिश्रम घ्यावेत, असे आवाहन वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी उद्योग आणि निर्यात मंडळ प्रतिनिधींना केले.
व्यापार मंडळ आणि व्यापार विकास आणि प्रोत्साहन परिषदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतांना ते म्हणाले की, अनुदान बंद केल्यानंतर व्यवसाय वृद्धिंगत होतो. या संदर्भात त्यांनी एलईडी बल्ब उत्पादनाचे उदाहरण दिले. उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले की देशांतर्गत निर्मिती आणि व्यवसाय वाढतो यातूनच आयात वस्तूंना पर्याय तयार होतो आणि उत्पादनाचा दर्जाही उंचावतो असे गोयल म्हणाले.
भारतातल्या बाजारपेठेच्या संधीचा लाभ घेता येईल या विचाराने प्रत्येक देशाला भारतात गुंतवणूक करण्याची इच्छा आहे.जागतिक पातळीवर आधिक उंची गाठण्यासाठी भारताने मोठी झेप घेण्याची गरज असून विकासाचे लाभ सर्व वंचित आणि शोषितापर्यंत पोहोचण्याची खातरजमा करायला हवी. व्यापारातले अडथळे आणि ढासळता आर्थिक विकास यामुळे भारतासह संपूर्ण जग आव्हानात्मक काळातून जात आहे. म्हणूनच जागतिक व्यापारातला आपला वाटा वाढविण्यावर प्रयत्न करावे.