पुणे – गेल्या दोन दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसानंतर आता पुन्हा उकाड्यात वाढ झाली आहे. पुढील चार ते पाच दिवसांमध्ये तापमानात आणखी वाढ होऊन उन्हाचा चटका वाढणार आहे. त्याचप्रमाणे पुढील तीन दिवस विदर्भामध्ये काही ठिकाणी पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
गेल्या आठवड्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट होती. काही ठिकाणी गेल्या दहा ते बारा दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा 40 अंशांच्या आसपास किंवा त्यापुढेही नोंदविला जात आहे. कमाल तापमानामध्ये सरासरीच्या तुलनेत दोन ते चार अंशांनी वाढ नोंदविली जात आहे. कोकण विभागातही तापमानात काहीशी वाढ नोंदविण्यात येत आहे.
कमाल तापमानासह किमान तापमानातही वाढ झाल्याने रात्रीचा उकाडा वाढत आहे. बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत अधिक आहे. मध्य महाराष्ट्रात किमात तापमान हे दोन ते तीन अंशापेक्षा जास्त आहे. मराठवाड्यात सुद्धा तशीच स्थिती आहे. सरासरीच्या तुलनेत जास्त तापमान नोंदविले गेले आहे. विदर्भातील चंद्रपूर येथे 43.4 अंश सेल्सिअस उच्चांकी तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील पुण्यात तापमान 40 अंशांच्या आसपास आहे. मुंबईतील सांताक्रुझ येथे 33 अंश तापमान होते. मराठवाडयातील बीडमध्ये 42.1 अंशांपुढे तापमान आहे. विदर्भात अमरावती, चंद्रपूर, नागपूर आदी ठिकाणी 43 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद होत असून, या भागात सर्वाधिक उकाडा आहे.
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह कर्नाटकच्या परिसरातील कमी दाबाचे क्षेत्र सध्या विरून गेले आहे. त्यामुळे उन्हाचा चटका पुन्हा वाढू लागला आहे. मराठवाडा आणि विदर्भात सर्वच ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंशांवर आहे. पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.