निळवंडे धरणस्थळी सुरू असलेले आंदोलन घेतले मागे
अकोले: मुख्यमंत्र्यांच्या दालनात उद्या (दि.11) दुपारी एक वाजता मुख्यमंत्र्यांसमवेत प्रकल्पग्रस्त, पाटग्रस्त बैठक यांची बैठक बोलावण्यात आली आहे. माजी मंत्री मधुकरराव पिचड व आ. वैभवराव पिचड हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे निळवंडे धरणस्थळी सुरू झालेले आंदोलन आज स्थगित करण्यात आले.
तणावाच्या वातावरणात निळवंडे कालवेग्रस्त व प्रकल्पग्रस्त कृती समिती व प्रशासन यांच्यातील तिढा सोडविण्यास मुख्यमंत्र्यांचे कार्यालय धावले. माजी मंत्री पिचड, आ. पिचड व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नाला व संघर्षाला यश आल्याने उद्या मुख्यमंत्री कार्यालयात ही बैठक निळवंडे कालवे व प्रलंबित प्रश्नांवर बैठक होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी बैठक घेण्यासाठी हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे आज निळवंडे धरणाच्या परिसरातील वातावरण निवळले.
काल (दि.9) पासून निळवंडे धरण स्थळ (खोंडवस्ती-निंब्रळ) येथे कालवेग्रस्त व प्रकल्पग्रस्त कृती समितीने “धरणे आंदोलन व बैठा सत्याग्रह’ सुरू केला होता. पहिल्या दिवशी जवळपास 150 आंदोलक उपस्थित होते. मात्र आज प्रशासनाने कालव्याचे काम सुरू करण्याच्या दृष्टीने मोठा पोलीस बंदोबस्त व यंत्रणा वाढविल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे जवळपास 300 महिला व 700 च्या आसपास कालवेग्रस्त शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी जमा झाले होते. प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, तहसीलदार मुकेश कांबळे, व जलसंपदाचे कार्यकारी अभियंता शिंगाडे, पो.नि.मुकंद देशमुख आदीनीं आंदोलकांना फक्त कामाची “लाइनआऊट’ आखून देण्यासाठी विनंती केली.
मात्र आंदोलकांनी त्यास विरोध केला. याच दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयातून माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्याशी निळवंडे कालवेप्रश्नी व इतर प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी दि.11 जून रोजी दुपारी एक वाजता मंत्रालयात मुख्यमंत्री यांच्या दालनात आयोजीत करण्यात आली आहे. त्यामुळे कृती समितीने हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले. प्रशासनानेही पोलीस बंदोबस्त काढून घेतल्याने वातावरण निवळले आहे. कृती समितीचे अशोकराव देशमुख, अशोकराव आरोटे, यशवंतराव आभाळे, गोरक्ष मालुंजकर, राजेंद्र डावरे, खंडू वाकचौरे, अरुण गायकर, कॉ. शांताराम वाळुंज, गोरख मालुंजकर, आ. चि. धुमाळ, गंगाराम नलावडे, भाऊसाहेब वाळुंज, शंकरराव वाळुंज, संतोष तिकांडे, रावसाहेब दौंड, बाळासाहेब घोडके, सुभाष मालुंजकर यांच्यासह कालवे व पाटग्रस्त शेतकरी उपस्थित होते.