आ. जयकुमार गोरे : 14 महिन्यात जिहे-कटापूरचे पाणी आंधळीत आणणार
कोणाचेही अतिरिक्त महत्व वाढू देऊ नका
कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष एम. के. भोसले यांनी आघाडीचा धर्म पाळणार म्हणून आमदार गोरेंच्या निर्णयाविरोधात जावून भूमिका घेतली आहे. आ. जयकुमार गोरे यांनी त्यांच्याच गावात बैठक घेऊन कोणाचेही अतिरिक्त महत्व वाढू देऊ नका असे आवाहन केले. धनगर समाजबांधवांच्या सभामंडपाचे काम माझ्या माध्यमातून झाले. त्याचे गावातील कोणीही श्रेय घेऊ नये, अशांच्या विरोधात माझी लढाई 23 तारखेनंतरची राहील, असेही
म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
खटाव – माढा लोकसभा मतदारसंघात पाणी आणतो म्हणून पवार साहेबांनी जनतेची फसवणूक केली आहे. त्यामुळे दुष्काळी माण खटावची जनता घड्याळाला कदापीही मतदान करणार नाही. माण-खटावची जनता शिवधडीच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार असून माढ्याचा खासदार माण-खटावची जनताच ठरवणार असल्याचे वक्तव्य आ. जयकुमार गोरे यांनी केले. तोंडले, ता. माण येथील कोपरासभेत ते बोलत होते. जि. प. सदस्य अरूण गोरे, अर्जुन काळे, दादासाहेब काळे, जगन्नाथ जाधव उपस्थित होते.
आ. गोरे म्हणाले, माण तालुक्यात 91 गावांना उरमोडीच्या योजनेतून पाणी उपलब्ध करून दिले आहे. त्यात अजून सात गावांचा सामावेश झाला आहे. धोम बलकवडीच्या योजनेत समाविष्ठ माणच्या उत्तरेकडील गावांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप ना. रामराजेंनी करत हक्काचे पाणी फलटणला नेले. मात्र, या वंचित गावांना पाणी देण्याची जबाबदारी आपण उरमोडीप्रमाणेच घेतली आहे. मुख्यमंत्री यांना आपण जिहे-कटापूर योजनेतून आंधळी तलावातील पाणी उत्तर माणमधील 35 गावांना शेतीसाठी देण्यात यावे अशी मागणी केली होती.
यावर मुख्यमंत्र्यांनी महामंडळाने या योजनेमधून पाणी देण्यासाठी सर्वेक्षणाच्या प्रस्तावाला दि.29 मार्च रोजी तत्वत: मान्यता देत निधी उपलब्ध करून घ्यावा, असे सूचित केले. येत्या 14 महिन्यात जिहे-कटापूरचे पाणी आंधळी तलावात आणणार आहे. त्यानंतर टाकेवाडी ते कारखेलपर्यंतच्या 35 गावांना शेतीसाठी पाणी मिळवून देणार आहे. काम अंतिम टप्प्यात असून प्रस्तावात 35 गावे असली तरी उर्वरित गावांचा समावेश त्यात नक्कीच होणार आहे.