कराड – आम्ही संविधानाला मानतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या आदर्शाने आम्ही काम करत असल्याने कोणत्याही राजकीय पुढारी आणि संस्थांना आम्ही भीत नाही. सातारा जिल्ह्यात उदयनराजे भोसले यांच्या विरोधात उभे असलेल्या बहुजन समाजातील उमेदवारांना चाळीस हजार मते पडली. निवडणुकीत पडलेली मते म्हणजे चार लाखांसारखीच असून ती सर्वांनाच विचार करायला लावणारी आहेत, असे मत वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ मार्गदर्शक, नेते पार्थ पोळके यांनी व्यक्त केले.
कराड येथे बुधवारी पार पडलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या आभार मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा समन्वयक ऍड. संभाजीराव मोहिते होते. तर जिल्हाप्रमुख चंद्रकांत खंडाईत, राज्य महासचिव सचिन माळी, राज्य महासचिव नवनाथ पडळकर, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष अल्ताफ शिकलगार, अनिल सावंत, ऋषिकेश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अल्ताफ शिकलगार म्हणाले, देशाच्या फाळणीमध्ये सर्वात मोठा हात कोणाचा असेल तर तो आरएसएस वाल्यांचा आहे. त्यांनीच देशाची फाळणी घडवून आणली. आरएसएसपासून देशाला धोका आहे. चंद्रकांत खंडाईत म्हणाले, सध्याचे सरकार ग्लोबल इंडियाची व शायनींग इंडियाचे स्वप्न दाखवत आहे. मात्र, आजही वंचित बहुजन विकासापासून कोसो दूर आहेत. मेळाव्यास कराड, पाटण तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.