कोलकाता – कोलकात्यातील एनआरएस हॉस्पिटलमधील एका कनिष्ठ डॉक्टरवर १०जून रोजी झालेल्या हल्ल्यानंतर येथील कनिष्ठ डॉक्टरांनी संप पुकारला असून यामुळे राज्यभरातील सरकारी दवाखान्यांमधील वैद्यकीय सवांचा खोळंबा झाला आहे. याच पार्श्ववभूमीवर आज राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे संपावर असलेल्या कनिष्ठ डॉक्टरांच्या सर्व मागण्या राज्यसरकारने मान्य केल्याची माहिती दिली आहे.
यावेळी बोलताना ममता बॅनर्जी यांनी, संपावर असलेल्या कनिष्ठ डॉक्टरांना सेवेमध्ये पुन्हा रुजू होण्याची विनंती देखील केली असून संपावर असलेल्या डॉक्टरांवर राज्य सरकारने कोणतीही पोलीस कारवाई केली नसून यापुढच्या काळात देखील त्यांच्यावर कोणतीही पोलीस कारवाई करण्यात येणार नाही. मात्र संपाबाबतचा योग्य तो निर्णय डॉक्टरांनीच आपल्या सद्सद्विवेक बुद्धीने घ्यावा. राज्यातील वैद्यकीय सेवा पूर्णपणे विस्कळीत झाल्या आहेत. असे विधान केले.
याबाबत अधिक माहिती देताना ममता बॅनर्जी यांनी सांगितले की आपल्या सरकारमधील मंत्री तसेच उच्चधिकाऱ्यांनी आज व काल संपावर असलेल्या डॉक्टरांची भेट घेण्यासाठी त्यांची ५-५ तास वाट पहिली. मात्र संपावर असलेल्या कनिष्ठ डॉक्टरांच्या संघटनेतील कोणीही त्यांना भेट दिली नाही. संपावर असलेल्या डॉक्टरांनी लोकप्रतिनिधींचा अशा प्रकारे अपमान करणे खेदजनक आहे.