कोलकता -लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे धास्तावलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी राज्य मंत्रिमंडळात तडकाफडकी काही फेरबदल केले. त्यानुसार काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल करण्यात आला. तर काही मंत्र्यांवर अतिरिक्त खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पश्चिम बंगालमध्ये जोरदार मुसंडी मारली.
भाजपने त्या राज्यातील लोकसभेच्या 42 पैकी 18 जागा जिंकल्या. ममतांच्या तृणमूल कॉंग्रेसने भाजपपेक्षा 4 जागा जास्त जिंकल्या. मात्र, मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी तृणमूलला मोठा फटका बसला. भाजपची मुसंडी तृणमूलच्या गोटात चिंता पसरवणारी ठरली आहे. पश्चिम बंगालमध्ये 2021 मध्ये विधानसभा निवडणूक होईल. ती निवडणूक ध्यानात घेऊन तृणमूलला आणखी भक्कम करण्याचे आव्हान आता ममतांपुढे आहे.