नवी दिल्ली – पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या निती आयोगाच्या बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी आयोजित केलेल्या सर्व पक्षांच्या प्रमुखांच्या बैठकीवरही बहिष्कार घातला आहे.
या बैठकीत वन नेशन वन इलेक्शन या विषयावर प्रामुख्याने चर्चा केली जाणार आहे. त्यावर इतक्या घाईगडबडीने बैठक बोलावण्याऐवजी सरकारने त्याविषयी आधी श्वेत पत्रिका जारी करून आपली नेमकी भूमिका व योजना स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या संबंधात संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांना पाठवलेल्या पत्रात ममतांनी म्हटले आहे की या विषयावर आधी व्यापक चर्चा आणि तज्ज्ञांशी सल्लामसलत करणे गरजरचे आहे.
हा एक महत्वाचा आणि संवेदनशील विषय आहे. इतक्या कमीवेळात त्यावर बैठक आयोजित करून चर्चा केल्यास या विषयाला योग्य न्याय मिळणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. सर्व पक्षांना आधी आपली नेमकी योजना समजावणारी श्वेत पत्रिका काढा आणि त्यांना त्यावर विचार करण्यासाठी पुरेसा वेळ देऊन मग अशी बैठक बोलवा अशी सूचनाहीं ममतांनी जोशी यांना केली आहे.