विजय मिळवून देईल याचा विश्वास होता
हैदराबाद – आयपीएलच्या बाराव्या मोसमातील अंतिम सामन्यात चेन्नईच्या संघाला विजयासाठी 9 धावांची गरज असताना कर्णधार रोहित शर्माने अखेरच्या षटकांत लसिथ मालिंगा कडे चेंडू सोपवल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. यावेळी मालिंगाने अखेरच्या षटकांत केवळ 7 धावा देत मुंबईच्या संघाला विजय मिळवून दिला. या विषयी सामन्यानंतर बोलताना रोहितने मालिंगाला अखेरचे षटक देण्यामागच्या कारणाचा उलगडा केला असून मालिंगा हा चॅम्पियन गोलंदाज असल्याने त्याला अखेरचे षटक टाकायला दिले असे रोहितने नमूद केले.
दरम्यान मुंबई आणि चेन्नई दरम्यान झालेल्या अंतिम सामन्यात मुंबईच्या संघाने चेन्नईचा केवळ एका धावेने पराभव करत चौथ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. आयपीएलच्या मोसमातील अंतिम सामन्यात मालिंगा दिलेल्या षटकाविषयी बोलताना रोहित म्हणाला की, लसिथ मालिंगा हा जागतीक दर्जाचा सर्वोत्तम गोलंदाज असून त्याने आता पर्यंत अशा प्रकारच्या दबावाच्या वेळी अनेक वेळा गोलंदाजी केली असून आजच्या सामन्यातही त्याच्या कडून आम्हाला तीच अपेक्षा होती. जरी त्याने आपले तिसरे षटक अतिशय महागडे टाकले असले तरी तो आम्हाला विजय मिळवून देईल याचा आम्हाला विश्वास होता आणि त्याने यावेळी आमचा विश्वास सार्थ ठरवत ठरावीक ठिकाणी चेंडू टाकत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला असेही रोहितने यावेळी नमूद केले.
तसेच तो पुढे म्हणाला की, अखेरच्या षटकासाठी हार्दिक पांड्याचेही नाव माझ्या विचारात होते, कारण त्याने संपुर्ण मोसमात उत्तम गोलंदाजी केली होती. मात्र, दडपणाच्या परिस्थितीत गोलंदाजी करण्याचा अनुभव असलेल्या गोलंदाजाला गोलंदाजी द्यावी असे मला ऐनवेळी वाटले. मलिंगाने अशा पद्धतीच्या परिस्थितीमध्ये अनेकदा गोलंदाजी केली आहे. म्हणून मी त्याला शेवटचे षटक टाकण्यास बोलावले, असे रोहितने यावेळी सांगितले.
तसेच यावेळी पुढे बोलताना रोहित म्हणाला की, शार्दुल ठाकुर सोबत अनेक सामने खेळलो असल्याने तो कश्या प्रारे चेंडू मारतो याचा मला अंदाज होता. त्यामुळे मी अखेरचा चेंडू यॉर्कर आणि कमी वेगाचा टाकण्याचा सल्ला मालिंगाला दिला होता. आणि मालिंगाने केलेही तसेच त्यामुळे आमचा विजय सुकर झाला असेही तो यावेळी म्हणाला.
तर, कर्णधार म्हणून मी प्रत्येक सामना आणि प्रत्येक स्पर्धा समजून घेण्याचा आणि शिकण्याचा प्रयत्न करतो आहे. पण या स्पर्धेच्या विजेतेपदाचे श्रेय हे माझ्या पेक्षा जास्त संपूर्ण संघाला द्यायला हवे. कर्णधार हा संघातील खेळाडूंचे प्रतनिधीत्व करत असतो असा माझा ठाम विश्वास आहे आणि खेळाडूच चांगला कर्णधार घडवतात, असे मला वाटते असेही रोहितने यावेळी नमूद केले.
तसेच पुढे बोलताना तो म्हणाला की, यंदाच्या मोसमात आमच्या संघाने चांगल्या दर्जाचे क्रिकेट खेळले. आम्ही गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आलो हे आमच्यासाठी खूप चांगले झाले. स्पर्धेच्या सुरुवातीला आम्हाला स्पर्धेचे 2 विभाग करायचे होते. पण केवळ मैदानवरील 11 खेळाडूच नव्हे, तर इतर खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि इतर सर्व सहायक यांचाही हा विजय आहे. स्पर्धेत आमची गोलंदाजी उत्कृष्ट झाली. अनेक सामने आम्हाला गोलंदाजानी जिंकवून दिले आणि म्हणूनच आम्ही स्पर्धेचे विजेतेपद पटकावू शकलो. असे म्हणत रोहितने आपल्या गोलंदाजांचे कौतूक केले.