मुंबई – मुंबईतील मालाडमधील कुरार परिसरातील पिंपरीपाडा येथे झोपड्यांवर भिंत कोसळून तब्बल 18 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत 13 जण जखमी देखील झाल्याचे समजते आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ही भिंत कोसळली असल्याचे समजते. रात्री दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन आणि एनडीआरएफच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यास सुरुवात केली.
मिळालेल्या माहिती नुसार कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जीर्ण झालेली भिंत अचानक झोपड्यांवर कोसळली. ज्यामध्ये अनेक जणांचा ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यू झाला. बचाव कार्यात काही जणांना बाहेर काढण्यात आले असून जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात काही वेळ घबराट पसरली होती. पण त्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, या संपूर्ण दुर्घटनेमुळे स्थानिक प्रशासनाविषयी संताप व्यक्त करत आहेत. प्रशासनाने योग्य उपाययोजना न केल्याने ही दुर्घटना घडली असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
मालाड सबवेत स्कॉर्पिओ गाडी अडकल्याने दोघांचा गुदमरुन मृत्यू
मालाड सबवेमध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. मृत झालेले दोघेही स्कॉर्पिओ गाडीत प्रवास करत होते. ही गाडी मालाड सबवेमध्ये पाण्यात अडकली होती. गाडीत अडकल्याने गुदमरुन दोघांचा मृत्यू झाला आहे. सहा तासांनी काचा फोडून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले आहेत. दोघांचीही ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.
कल्याणमध्येही भिंत कोसळून 3 जणांचा मृत्यू
मुंबई आणि पुणे प्रमाणेच कल्याणमध्येही मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. कल्याणमधील दुर्गाडी परिसरातील ऊर्दू शाळेजवळील भिंत कोसळली आहे. रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी एक महिला गंभीर जखमी झाली असून सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.