एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार नाही
मुंबई – गत लोकसभा निवडणूकीत शिवसेना- भाजपा 42 जागा जिंकली होती. परंतु यंदा राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस 22 जागांच्यावर विजय मिळवेलच. पण पक्षाच्या स्थापनेनंतर प्रथमच महाराष्ट्रात राष्ट्रवादी सर्वाधिक जागा जिंकेल, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केला. तसेच देशात त्रिशंकू लोकसभा होणार आहे. त्यामुळे एनडीएला बहुमत मिळणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
नवाब मलिक म्हणाले, न्यायालयाने पहिल्यांदा व्हिव्हीपॅट स्लीप मोजायला सांगितली आहे. त्यानंतर ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक मशीनची मोजणी केली जावी. म्हणजे ज्या शंका होत्या त्या समजावून सांगितल्या आहेत. पाच ईव्हीएम मशीनची मोजणी करण्यात यावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. प्रश्न ईव्हीएमचा नाही, प्रश्न जिंकण्याचा किंवा पराभूत होण्याचा नाही तर देशात लोकशाहीच्या प्रती विश्वास निर्माण करण्याचा आहे.
जर लोकांच्या मनात शंका निर्माण होत असेल तर निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे की, विश्वास निर्माण केला पाहिजे. परंतु निवडणूक आयोग ज्याप्रकारे व्यवहार करत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात शंका अजुन वाढू लागली आहे. हे निवडणूक आयोगाला समजायला हवे, असे खडेबोल सुनावले आहेत.
देशात त्रिशंकू लोकसभा होणार आहे. यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे एनडीएला बहुमत मिळणार नाही. राष्ट्रवादीने वारंवार सांगितले आहे की आमची मर्यादित ताकद आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या पदाचा दावा करणार नाही. आणि पवारसाहेब यांनीही वारंवार स्पष्ट केले आहे की या पदाचे ते दावेदार नाहीत. परंतु ते पर्यायी सरकार बनवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.